Team MyPuneCity – वाघोली पोलिसांनी एका सराईत सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीला अटक करत पुणे शहरातील दोन, पुणे ग्रामीणमधील एक आणि नाशिक शहरातील तीन अशा सात गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. या टोळीकडून सुमारे १ लाख ८९ हजार रुपये किमतीचे सोने, मोबाईल फोन आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये वाघोली पोलिसांनी प्रशांत संतविजय यादव (वय १९, रा. शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) आणि कुणाल विश्वनाथ साबळे (वय २१, रा. स्वामी नगर, सिडको, नाशिक) या दोघांना अटक केली आहे. तपासादरम्यान या दोघांनी दौंड येथून एक दुचाकी चोरी करून तिचा वापर करून वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी ताजीम सल्लाउद्दीन अन्सारी (वय २०, रा. अशोकनगर, सातपूर, नाशिक) याच्या साथीने कोरेगाव पार्क आणि विमाननगर परिसरातही सोनसाखळी चोरी केल्याचे उघड झाले आहे.
Pimpri Chinchwad: दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी संपूर्ण जीवन शेतकरी, गरिब आणि कष्टकऱ्यांच्या उद्धारासाठी समर्पित केले -शत्रुघ्न (बापू) काटे
चोरी केलेल्या सोनसाखळ्या त्यांनी आपले दोन मित्र संजोग संतोष भांगरे (वय १८, रा. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ, शिवाजीनगर, नाशिक) आणि मनोज उदय पाटील (वय ३१, रा. स्नेहल रो हाऊस, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ, शिवाजीनगर, नाशिक) यांच्याकडे दिल्या होत्या.
पोलिसांनी खालील गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला आहे:
- वाघोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं. २१९/२०२५
- विमानतळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं. २४६/२०२५
- कोरेगाव पार्क पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं. ५१/२०२५
- दौंड पोलीस ठाणे (पुणे ग्रामीण) गुन्हा रजिस्टर नं. ३६९/२०२५
तसेच ताजीम सल्लाउद्दीन अन्सारी हा नाशिक शहरातील गंगापूर, म्हसरूळ आणि सातपूर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून १ लाख ८९ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल फोन, १ दुचाकी आणि सोनसाखळी असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी ताजीम अन्सारी, संजोग भांगरे आणि मनोज पाटील यांना पुढील कार्यवाहीसाठी विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे आणि वरीष्ठ पोलीस निरीक्षक (वाघोली) युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या तपास पथकात पोउपनि मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, रामचंद्र पवार, समीर भोरडे, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, मंगेश जाधव, राजाराम अस्वले, शिवाजी सालके, शिवाजी चव्हाण आणि प्रीतम वाघ यांनी परिश्रम घेतले.