सरहद पुणेच्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन
Team My Pune City –शिवसेना ही केवळ सत्तेसाठी जन्माला आलेली (Uddhav Thackeray) नाही. त्यामुळे सत्ताप्राप्तीसाठी राजकारण करायचे नाही हे सूत्र बाळासाहेबांपासून आम्ही पाळत आलो आहेत, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा)चे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
सरहद, पुणेच्या वतीने गुजर निंबाळकरवाडी येथे साकारण्यात आलेल्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सरहदचे संस्थापक संजय नहार, संतसिंग मोखा, वसंत मोरे, शैलेश वाडेकर, शैलेश पगारिया आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
Sandhya Shantaram: ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन ;वयाच्या 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Talegaon Dabhade: गोल्डन रोटरी तर्फे प्राथमिक शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम
या प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी वडील बाळासाहेब ठाकरे आणि काका श्रीकांत ठाकरे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, माझे काका श्रीकांत ठाकरे यांच्या नावाने स्टुडिओ साकारला याचा मला खूप आनंद आहे. त्यांच्या मनात सतत संगीत सुरू असायचे. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर होते. त्यांच्यासमवेत त्यांची ही दोन मुले बाळासाहेब आणि श्रीकांत यांनी मार्मिकच्या माध्यमातून सर्व मदत केली होती. असे काका आणि वडील लाभले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. शिवसेनेची खरी ताकद शिवसैनिकामध्ये आहे. त्यामुळे बाळासाहेबांनीसुद्धा सत्तेसाठी कधी राजकारण केले नाही. वेळ आली तेव्हा सत्तेवर लाथ मारली. शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही तर सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आलेली आहे.
मणिपूरमधील एका मुलीने माझा सन्मान केला त्याने मी निःशब्द झालो आणि मला गहिवरून आले असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, २०१४ नंतर खरे तर युतीचे सरकार आले. पण आज परिस्थिती काय आहे. मणिपूर पेटलेले आहे. लेह-लडाखमध्ये संघर्ष सुरू आहे. गावागावात जवान तैनात केलेले आहेत. आसाममध्येही परिस्थिती पेटलेली आहे. काश्मीरमध्येही अशांतता आहे, हे सगळे चित्र चांगले नाही. ७५ वर्षे झाली आता हेच का स्वातंत्र्य असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. अशा परिस्थितीत सूर जुळवायचे कसे आणि मैफिल रंगवायची कशी हा प्रश्न पडतो असे उद्धव ठाकरे म्हणाले.
या वेळी संजय राऊत म्हणाले, श्रीकांत ठाकरे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते उत्तम संगीतकार, व्यंगचित्रकार, वक्ते, संपादक, लेखक होते. बाळासाहेब आणि त्यांची राम-लक्ष्मणाची जोडी होती. संगीतक्षेत्राला त्या काळात ५० वर्षे पुढे नेण्याचे काम श्रीकांत ठाकरे यांनी केले. आज जे मोठे गायक दिसतात त्यातील अनेकांना पहिल्यांदा गाण्याची संधी ठाकरे यांनीच दिली होती.

प्रास्ताविक करताना संजय नहार यांनी बाळासाहेबांच्या अनेक मौलिक आठवणींना उजाळा दिला. काश्मीरमधील कुपवाडा येथील मुले मातोश्रीवर आलेली होती त्यावेळी आत येताना ती घाबरत होती पण बाहेर पडल्यानंतर आमच्या आजोबांना भेटल्यासारखे आम्हाला वाटले अशा भावना मुलांनी व्यक्त केल्या होत्या ही आठवण नहार यांनी सांगितली. बाळासाहेब हे महाराष्ट्राच्या मातीतील उमदे व्यक्तिमत्त्व होते असे सांगून त्यांनी आठवणी जागवल्या.
या वेळी गुजरवाडी व कात्रज ग्रामस्थांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला. सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी प्रास्ताविक केले. शैलेश वाडेकर यांनी आभारप्रदर्शन केले.
महमंद रफींसाठी मराठी गाणे लिहिले ऊर्दूत – ठाकरे
मजहर सिद्दीका यांनी शोधिशी मानवा हे गीत सादर केले त्याचे अभिनंदन करून उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत ठाकरे यांची एक सुंदर आठवण सांगितली. श्रीकांत ठाकरे यांनी महंमद रफी यांच्याकडून हे गीत गाऊन घेतले होते. पण विशेष म्हणजे श्रीकांत ठाकरे यांना उत्तम ऊर्दू येत असते. त्यामुळे महंमद रफी यांना त्यातील शब्द कळावेत म्हणून ते मराठी गाणे त्यांनी महंमद रफी यांना ऊर्दूत लिहून दिले होते. ठाकरे यांनी सांगितलेल्या या आठवणीला उपस्थितांनी दाद दिली.