साहित्य क्षेत्रातील करम प्रतिष्ठानचे कार्य उल्लेखनिय : डॉ. सदानंद मोरे
करम प्रतिष्ठानचा 10वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा
स्मिता जोशी-जोहरे यांच्या ‘तरंग’ कथासंग्रहाचे प्रकाशन
Team MyPuneCity – माणसाकडे भाषा असल्याने तो आपल्या विचार, कल्पना, अनुभवातून कथेची निर्मिती करू शकतो. अनुभवाला कल्पनेची जोड दिल्यास उत्तम कथा निर्माण होते. आपल्या जगण्याशी, अनुभवांशी साधर्म्य सांगणाऱ्या कथा वाचकाला विशेष भावतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कुटुंबव्यवस्थेवर परिणाम होत असताना सामाजिक विचारमंथन होण्यासाठी साहित्यप्रकारच उपयुक्त ठरतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले. साहित्याच्या क्षेत्रातील उल्लेखनिय योगदानाबद्दल करम प्रतिष्ठनच्या कार्याचा डॉ. मोरे यांनी गौरव केला.

करम प्रतिष्ठानचा दहावा वर्धापनदिन सोहळा आज (दि. 11) पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. मोरे अध्यक्षपदावरून बोलत होते. करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन, डॉ. बाबूल पठाण, स्मिता जोशी-जोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी स्मिता जोशी-जोहरे यांच्या ‘तरंग’ या कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. ॲड. प्रमोद आडकर, ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर, स्वाती सामक यांची उपस्थिती होती.
सुरुवातीस प्रास्ताविकात भूषण कटककर यांनी करम प्रतिष्ठानच्या 10 वर्षांच्या प्रवासाचा मागोवा घेत संस्थेच्या उपक्रमांविषयी माहिती सांगितली तसेच भविष्यात राबविल्या जाणाऱ्या संकल्पांविषयी अवगत केले. प्रतिष्ठनच्या उपक्रमातून अनेक थांबलेले हात लिहिते झाले असेही आवर्जून सांगितले.
Sangurdi Road : इंदोरी ते सांगुर्डी रस्त्याच्या ₹ ७.६४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन
कथा-वाङ्मय हा साहित्य प्रकार माणसाला जगायला, सक्षम व्हायला उपयुक्त ठरतो, असे सांगून डॉ. मोरे पुढे म्हणाले, स्मिता जोहरे यांच्या कथा संग्रहातून विवाह संस्था, स्त्रीची रूपे, वृद्धत्वाचे प्रश्न, कुटुंब व्यवस्था यावर भाष्य होत प्रस्थापित संकल्पना बदलण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. अत्यंत झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे मानवाला सतत बदलांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे आज कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे. अशा वेळी कथांचा, साहित्यकृतींचा सामाजिक मंथन होण्यासाठी नक्कीच उपयोग होतो.
Vinod Sutar : पिंपरी-चिंचवडमधील तबलावादक व संगीत शिक्षक विनोद सुतार यांचा अपघाती मृत्यू
माझा साहित्यप्रवास लहानसाच आहे, असे सांगून स्मिता जोशी-जोहरे म्हणाल्या, अनुभवांचा साठा, भरघोस वाचन, लोकसंग्रह आणि करम प्रतिष्ठान सारख्या समूहातून मिळालेले प्रोत्साहन यातून मी लिहिती झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले तर परिचय वासंती वैद्य यांनी करून दिला. वर्धापन दिनानिमित्त मराठी स्वरचित कवी आणि गझल संमेलनाचे संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते. संयोजन निरुपमा महाजन, प्राजक्ता वेदपाठक, मुक्ता भुजबले, वैजयंती आपटे, वासंती वैद्य यांनी केले.
Maharashtra Brahmin Sabha: “मस्तानीबाईंचा अपमान सहन केला जाणार नाही!”; महाराष्ट्र ब्राह्मण सभेकडून तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा