Team MyPuneCity –पुणे रेल्वे स्थानकाचे नामकरण थोरले बाजीराव पेशवे यांच्याच्या नावाने व्हावे, अशी मागणी राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी यांनी नुकतीच रेल्वे विभागाच्या बैठकीत केली होती. यानंतर समाजमाध्यमांवर व पुणे शहरात काही ठिकाणी त्यांच्यावर अत्यंत गलिच्छ व अर्वाच्य भाषेत वैयक्तिक, जातीय व लैंगिक टीका करणारे बॅनर्स लावण्यात आले. या प्रकाराचा निषेध करत अनेक ब्राह्मण संघटनांनी आणि सामाजिक संस्थांनी डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने देखील लक्ष घालून संबंधितांवर तातडीने चौकशी व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
महिला आयोगाच्या समुपदेशक लक्ष्मण मानकर यांच्या स्वाक्षरीने २५ जून २०२५ रोजी पाठवलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या घटवाई यांनी या बदनामीविरोधात आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. त्या तक्रारीची प्रत सोबत जोडून आयोगाने हा विषय गंभीर स्वरूपाचा असल्याचे सांगत, पोलिसांनी तत्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी आणि तिचा तपशीलवार अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ च्या कलम १२(२) व १२(३) नुसार आयोगाला ई-मेलने सादर करावा, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणात ब्राह्मण समाजातील विविध संघटनांनी – आम्ही सारे ब्राह्मण, परशुराम हिंदू सेवा संघ, ब्राह्मण जागृती सेवा संघ, अ.भा. ब्राह्मण महासंघ आदी संस्थांनी एकत्र येत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या संस्थांचे म्हणणे आहे की, पुण्यातील काही चौकांमध्ये महिला खासदारांविरोधात लावण्यात आलेले बॅनर्स केवळ एका राजकीय मतभेदाचा भाग नसून, ते वैयक्तिक, सामाजिक आणि जातीय पातळीवर ब्राह्मण समाज व महिलांची बदनामी करणारे आहेत.
तक्रारकर्त्यांनी संबंधित सोशल मीडिया पोस्ट्सचे स्क्रीनशॉट, होर्डिंग्जचे फोटो आणि मजकूर पोलिसांना सादर करून आरोपींची अकाउंट्स बंद करण्यासाठी सायबर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे.
या प्रकारामुळे समाजात द्वेष पसरवण्याचा, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर घटकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार असून, त्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी गंभीरपणे कारवाई न केल्यास परिस्थिती बिघडू शकते, असा इशाराही तक्रारकर्त्यांनी दिला आहे.
पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याबाबतची मागणी ही लोकशाही मार्गाने मांडण्यात आली असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा याबाबत निवेदन देण्यात आल्याचे या संस्थांनी स्पष्ट केले आहे.
या सर्व प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी एकमुखी मागणी सध्या पुण्यातून होत आहे.