वंदे मातरम् राष्ट्रचिंतनाचे प्रतीक – पार्थ चॅटर्जी
देश आत्मनिर्भर बनण्यासाठी वंदे मातरम् प्रेरणा देईल-पार्थ चॅटर्जी
भारतीयांच्या हृदय-सिंहासनावर वंदे मातरम्चे स्थान अढळ – पार्थ चॅटर्जी
Team My Pune City –वंदे मातरम् हे गीत राष्ट्रप्रेम आणि (Pune)राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या राष्ट्रचिंतनाचे प्रतीक आहे. हे गीत म्हणजे केवळ शब्द नसून भारताचा आत्मा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात वंदे मारतम् या गीताने क्रांतिकारांना प्रेरित केले. वर्तमानकाळात एक नवीन विचार देत देशप्रेमाची जागृती निर्माण केली आणि भविष्यकाळात आपला देश आत्मनिर्भर होण्यासाठी, वैश्विक पातळीवर महासत्ता बनविण्यासाठी हे गीत प्रेरणा देईल, असा विश्वास ऋषी बंकिमचंद्र यांचे वंशज पार्थ चॅटर्जी यांनी व्यक्त केला.
ऋषी बंकिमचंद्र लिखित ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रमंत्राच्या निर्मितीस तिथीनुसार कार्तिक शुद्ध नवमीला (दि. 31 ऑक्टोबर 2025) 150 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने आज (दि. 31) ‘वन्दे मातरम्’ गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन ऋषी बंकिमचंद्र यांचे वंशज पार्थ चॅटर्जी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
Sanjay Raut: संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड; काही काळ राजकारणातून ब्रेक
मएसो सिनिअर कॉलेज, वन्दे मातरम् सार्ध शती जयंती समारोह समिती, पाञ्चजन्य फाउंडेशन आणि जन्मदा प्रतिष्ठानतर्फे मएसो सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते.
जन्मदा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मकरंद केळकर, वंदे मातरम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस, मएसो सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, पाञ्चजन्य फाउंडेशनचे सचिव समीर कुलकर्णी मंचावर होते.
पार्थ चॅटजी पुढे म्हणाजे, ऋषी बंकिमचंद्र यांनी रचलेल्या वंदे मातरम् या राष्ट्रमंत्राने भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाला एक नवे वळण दिले. वंदे मातरम् मंत्राने आपल्या प्राचीन संस्कृतीच्या या मातृपूजक परंपरेला पुनरुज्जीवित केले आहे. वंदे मातरम् या मंत्राने लहानांपासून वृद्धांपर्यंत, महिलांपासून निःशस्त्र सत्याग्रहींपर्यंत तसेच सशस्त्र संग्राम करणाऱ्या क्रांतिकारकांनाही विदेशी सत्तेविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. गेल्या 149 वर्षांपासून भारतीयांच्या हृदय-सिंहासनावर वंदे मातरम्चे जे स्थान निर्माण झाले आहे ते अद्यापपर्यंत कुणीही हिरावून घेऊ शकलेले नाही.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना भूषण गोखले म्हणाले, बंगाल आणि महाराष्ट्राचे वेगळे नाते आहे. बंगाल प्रमाणेच महाराष्ट्रालाही क्रांतिकारकांची परंपरा लाभली आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही वंदे मातरम् या गीताने सर्व भारतीयांना एकत्र आणले आहे.
डॉ. रवींद्र वैद्य यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले तर ‘वन्दे मातरम् 150’ या कार्यक्रमाविषयी तसेच ऋषी बंकिमचंद्र यांच्या जीवनातील कार्तिक शुद्ध नवमीचे महत्त्व या विषयी मिलिंद सबनीस यांनी माहिती दिली. पार्थ चॅटर्जी यांचा सत्कार भूषण गोखले यांच्या हस्ते करण्यात आला. सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौम्या महाडिक आणि श्रावणी अत्रे यांनी भू-माता स्तोत्र सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमा कुलकर्णी यांनी केले तर आभार समीर कुलकर्णी यांनी मानले.
आणि उलगडला वंदे मारतम्चा इतिहास..
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा युद्धघोष असणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम्’ या तेजस्वी काव्याच्या धगधगता, रोमांचक इतिहास पुणेकरांनी अनुभवला. निमित्त होते ‘वन्दे मातरम् 150’ या कार्यक्रमाचे. वंदे मातरम् च्या निर्मितीला 150 वर्षे झाल्यानिमित्ताने दृकाश्राव्य आणि अभिवाचनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वंदे मातरम् गीताचे पहिले जाहीर गायन, वंदे मातरम् शब्दाचा सामाजिक प्रभाव, कला क्षेत्रातही वंदे मातरम् गीताला मिळालेले स्थान, अनेक गायक व संगीतकारांना या गीताची पडलेली भुरळ, स्वातंत्र्य मिळण्याची आशा निर्माण झालेली असताना वंदे मातरम् गीतास झालेला विरोध, वंदे मातरम् हे राष्ट्रगीत न होता राष्ट्रीय गीत होऊन लाभलेला दर्जा असे विविध टप्पे अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून मांडण्यात आले. संहिता लेखन मिलिंद सबनीस यांचे तर दिग्दर्शन प्रसाद कुलकर्णी यांचे आहे. संगीत अजय पराड यांनी दिले असून अभिषेक खेडकर, अवंती लोहकरे, प्रदीप फाटक यांनी अभिवाचन केले. महेश लिमये आणि सुरेंद्र गोखले यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.


















