पर्यावरणाच्या सेवेसाठी आयुष्य वेचले; पंतप्रधानांच्या ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर
Team MyPuneCity – पर्यावरणासाठी झाडे लावणे हे केवळ सामाजिक जबाबदारी नव्हे, तर जीवनधर्म आहे,” असे मानणारे विष्णु लाम्बा हे ‘ट्रीमॅन ऑफ इंडिया’ म्हणून देशभर प्रसिद्ध आहेत. गेल्या तीन दशकांपासून झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे याच कार्यात ते झपाटल्यासारखे कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी देशभरात दीड कोटींहून( Pune ) अधिक झाडे लावली आहेत.
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील लाम्बा गावात जन्मलेले विष्णु लाम्बा यांचे निसर्गाशी नाते लहानपणापासूनच जोडले गेले. सातव्या वर्षी आईसोबत पहिले झाड लावले आणि त्यानंतर या कार्यात इतके गुंतले की आजवर त्यांनी लग्नही केले नाही. झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे, विकासाच्या नावाखाली तोडल्या जाणाऱ्या झाडांना वाचवणे हे त्यांचे जीवनध्येय झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रीन आर्मी योजनेचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही त्यांनी काम केले असून, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या राष्ट्रीय मोहिमेत प्रमुख भूमिका बजावत आहेत. त्यांच्या श्री कल्पतरु संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पुण्यातील तळजाई वनउद्यान, सीआरपीएफ तळेगाव, केंद्रीय विद्यालय देहूरोड येथे वृक्षारोपण करून हरित परिसर घडवले ( Pune ) आहेत.
त्यांनी केवळ झाडे लावली नाहीत, तर समाजात पर्यावरणाबाबत जागृती निर्माण केली. पक्ष्यांसाठी ‘परिंदों के लिए परिंडा’ उपक्रम, पर्यावरणपूरक विवाह, माळा-फुलांच्या ऐवजी तुळशीचे रोप देऊन स्वागत अशा अनेक अभिनव उपक्रमांतून त्यांनी समाजात पर्यावरण संवेदनशीलता निर्माण केली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून उंट राजस्थानचा राज्यप्राणी म्हणून संबोधण्यास, तर मोराच्या शिकारीवर बंदी घालण्यास मदत झाली.
झाडांबरोबरच दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजाती, पक्षी आणि प्राणी यांच्या संवर्धनासाठीही ते कार्यरत आहेत. देशभरातील २२ राज्यांत, तसेच १३ देशांमध्ये त्यांचे कार्य पोहोचले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राजीव गांधी पर्यावरण पुरस्कार, अमृता देवी बिश्नोई पुरस्कार यांच्यासह १५० हून अधिक सन्मान प्राप्त झाले आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विष्णू लांबा यांना ‘ट्रीमॅन ऑफ इंडिया’ ही पदवी बहाल केली आहे.
त्यांच्या ‘हरित भारत, हर्षित भारत’ या घोषवाक्याने प्रेरित होऊन लाखो तरुण त्यांच्या मोहिमेत सामील झाले आहेत. ‘श्री कल्पतरु संस्थान’च्या माध्यमातून महिला सशक्तीकरण, पशू-पक्षी रेस्क्यू, पर्यावरण पूजन, वृक्षमित्र सन्मान समारंभ असे अनेक सामाजिक उपक्रम ते सातत्याने ( Pune ) राबवत आहेत.
———————-
तळेगाव ‘सीआरपीएफ’मध्ये वृक्षारोपण
पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून श्री कल्पतरू संस्थान व तळेगाव येथील सीआरपीएफच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या परिसरात पाच हजार झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्याचे औपचारिक उद्घाटन नुकतेच ‘सीआरपीएफ’चे पोलीस उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर व ट्रीमॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. शंभरपेक्षा अधिक केंद्रीय राखीव सुरक्षा दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या नावाने एकेक झाड ( Pune )लावले.
———————-