“तुफानातील दिवा’’, “कुणाची वाट बघताय?’’ पुस्तकांचे प्रकाशन
Team My Pune City –कलावंताला जात-धर्म नसतो. नास्तिकता, आस्तिकता असलेल्या (Pune)आपल्या देशात समन्वयातूनच सांस्कृतिक संवाद घडत असतो. भगवान धेंडे यांचे लेखन विरोधाभासी असले तरी अंत:करणात बुद्ध असून गुरुदेव यांच्याविषयी भक्तीभाव आहे. प्रत्येकाच्या जीवनातील अर्थ समजून घेण्याची त्यांची समन्वयाची भूमिका आहे. त्यांच्या लेखनाचा धर्म हा माणुसकीचा आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
भगवान धेंडे लिखित ‘तुफानातील दिवा’ आणि ‘कुणाची वाट बघताय?’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज (दि. 18) महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब पवार आणि डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. सबनीस बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, चित्रपट निर्माते आप्पा बोराटे, अभिनेते जगन्नाथ निवंगुणे, ॲड. रंजना भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. मयूरी प्रकाशनतर्फे पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.
जाती-पातीच्या व्यवस्थेत राहूनही भगवान धेंडे यांचे साहित्याच्या क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. श्रद्धेचा सन्मान करताना त्यांनी लिखाणातून साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे, त्याचप्रमाणे माणुसकीचा धर्म जोपासला आहे. त्यांना जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागला तरी जीवनातील सकारात्मकता हे त्यांच्या यशाचे खरे कारण आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रावसाहेब पवार म्हणाले, सध्याचे समाजकारण, राजकारण याकडे बघितल्यानंतर आपण का जगतो आहोत असा प्रश्न पडतो. सकारात्मकता जपणारी माणसे वेचावी लागतात. सकारात्मक वृत्तीने जगणाऱ्या व्यक्तींकडे पाहिल्यानंतर जगण्याची उमेद मिळते. माणसाला माणूस म्हणून उभे करणे ज्याला समजते तो खरा माणूस होय.
Pune: भरतनाट्यम् नृत्याविष्कारातून साकारले गीत रामायण
Sunil Shelke : सामाजिक उपक्रमांतून रोटरी सिटीचे काम कौतुकास्पद-आमदार सुनिल शेळके
ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, आयुष्यात सेवाभाव महत्त्वाचा आहे. भगवान धेंडे यांच्या कथा-कवितांचे अभिवाचन झाल्यास त्यांच्या लेखनाची महती कळू शकेल.
डॉ. शरद कुंटे म्हणाले, धेंडे यांच्या कथा-कविता वाचल्यानंतर त्यांची विचारपद्धती समजून येते. विपरित पस्थितीत त्यांनी सकारात्मकता अंगी जोपासली असल्याने त्यांच्या लेखानात हुंकार दिसून येतो.
भगवान धेंडे यांनी लेखन प्रवास उलगडला. डॉ. सिद्धार्थ धेंडे, आप्पा बोराटे, जगन्नाथ निवंगुणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली अवचरे यांनी केले. सागर धेंडे, ब्रह्मानंद धेंडे यांनी स्वागत केले.