Team My Pune City – अनधिकृत वाहनांतून होणाऱ्या विद्यार्थी वाहतुकीला (Pratap Sarnaik)अटकाव करण्यासाठी राज्य परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. स्कूल व्हॅनची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून, यासाठीचे परवाने खुले करण्यात आले आहेत. या संदर्भातील अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
शालेय बसचे शुल्क अनेक पालकांना परवडणारे नसल्याने, तुलनेने कमी खर्चात खासगी रिक्षा किंवा टॅक्सीमधून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याकडे कल वाढला आहे. मात्र या वाहनांकडे वैध परवाना नसणे, योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपणे, तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण होणे असे प्रकार वारंवार उघडकीस येतात. या पार्श्वभूमीवर पालक, बस संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत परिवहन विभागाच्या बैठकीत ही समस्या अधोरेखित झाली.
Alandi : राखीने गुंफले निसर्ग रक्षणाचे बंधन!
Lonavala:घरगुती गॅस टाकी चोरणारा चोरटा झाला गजाआड
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी केंद्र सरकारच्या शालेय बस नियमावली (एआयएस-०६३) चा आधार घेत अद्यावत शालेय व्हॅन नियमावली (एआयएस-२०४) तयार करण्यात आली आहे. या मानकांचे पालन करणाऱ्या वाहनांनाच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस परवानगी दिली जाणार आहे. 2018 नंतर बंद करण्यात आलेली शालेय व्हॅन परवाना प्रक्रिया आता नव्या नियमांनुसार पुन्हा सुरू होणार आहे.
सुरक्षिततेसाठी शालेय व्हॅनमध्ये सीसीटीव्ही, डॅशबोर्ड स्क्रीन, जीपीएस, अग्निशमन अलार्म प्रणाली, दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म, ताशी 40 किमी वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर, पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे, लहान विद्यार्थ्यांसाठी पायरी तसेच गाडीच्या टपावर शाळेचे नाव असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देत, तसेच बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शालेय व्हॅनना मंजुरी देण्यात आली आहे. नियमावलीचे पालन करणाऱ्या नव्या व्हॅनधारकांना राज्य सरकार परवाने देईल.”