Team MyPuneCity – कचरा… नाव जरी काढले तरी (Pimpri News) नाक मुरडले जाते. रोजच्या जीवनात घरातून निघणाऱ्या ओल्या आणि सुक्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लागते, याचा विचार फार कमी लोक करतात. पण पिंपरीतील एका ज्येष्ठ नागरिकाने याच कचऱ्याला ‘सोनं’ बनवण्याची किमया साधली आहे. ७६ वर्षीय जगदीश नाईक गेल्या ३० वर्षांपासून आपल्या घरातील आणि बागेतील कचऱ्याचा पुनर्वापर करत आहेत. केवळ पुनर्वापरच नव्हे, तर त्यापासून ते उच्च प्रतीचे गांडूळ खतही तयार करतात आणि याच खताच्या मदतीने त्यांनी आपली बाग फुलवली आहे.
पिंपरी येथील टाटा मोटर्स सिनिअर ऑफिसर्स सोसायटीमध्ये राहणारे जगदीश नाईक यांनी आपल्या घरातून प्लास्टिक कचरा वगळता दुसरा कोणताही कचरा बाहेर जाऊ नये, याची काटेकोर काळजी घेतली आहे. त्यांची ही पर्यावरणपूरक जीवनशैली आज अनेकांसाठी प्रेरणास्रोत(Pimpri News) ठरली आहे.



अभियांत्रिकीचा अनुभव आणि निसर्गाची ओढ
या अनोख्या कामाबद्दल बोलताना जगदीश नाईक सांगतात, “मी मूळचा अभियंता असल्याने प्रत्येक गोष्टीत प्रयोग करण्याची मला पहिल्यापासूनच आवड (Pimpri News) होती. त्यात बागकामाची प्रचंड ओढ होती. ३३ वर्षे टाटा मोटर्समध्ये नोकरी केल्यामुळे समाजाचे आणि निसर्गाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना माझ्या मनात आपोआप रुजली. जवळपास ३० वर्षांपूर्वी आम्ही घरातच गांडूळ खत प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पातून तयार होणारे खत मी माझ्या बागेत वापरतोच, पण ते झाडांसाठी खूप पौष्टिक असल्याने माझे अनेक मित्र आणि सोसायटीमधील लोकही आवर्जून घेऊन जातात.”
स्वतःच्या मशिनमध्ये केले बदल
नाईक यांच्या गांडूळ खत प्रकल्पामध्ये घरातील ओल्या कचऱ्यासोबतच त्यांच्या सुंदर बागेतील कचराही वापरला जातो. मात्र, बागेतील सुकलेल्या फांद्या आणि पाने यांचे विघटन लवकर होत नाही. हे विघटन जलद गतीने व्हावे यासाठी नाईक यांनी खास मशीन खरेदी केले होते. पण त्या मशीनमध्येही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याने त्यांनी स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर अनेक बदल केले. आता त्यांच्या modified मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकला तरी त्याची अगदी बारीक पावडर तयार होते. याच बारीक कचऱ्याचा वापर गांडूळ खत प्रकल्पात केला जातो, ज्यामुळे उच्च प्रतीचे खत तयार होते. सोसायटीमधील अनेक लोक त्यांच्या बागेत याच खताचा वापर (Pimpri News)करतात आणि त्यांच्या बागाही फुलल्या आहेत.
कचऱ्याचा प्रभावी पुनर्वापर
जगदीश नाईक केवळ ओल्या आणि सुक्या कचऱ्याचाच पुनर्वापर करत नाहीत, तर दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचाही ते पुनर्वापर करतात. ते सांगतात की, जे प्लास्टिक पुनर्वापरायोग्य नसते, तेवढेच ते टाकून देतात. त्यांच्या बागेत अनेक झाडे वापरलेल्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये, कॅनमध्ये किंवा बाटल्यांमध्ये लावलेली दिसतात. इतकेच नव्हे, तर नारळाच्या झावळ्यांपासून ते स्वतःच्या घरी झाडू (Pimpri News) बनवतात.

या सगळ्या प्रयत्नांमुळे नाईक यांच्या घरातून वर्षाला साधारण दोन टन गांडूळ खताची निर्मिती होते. त्यामुळे त्यांच्या रोजच्या वापरातून निर्माण होणारा कचरा घराबाहेर जातच नाही. याच खताचा वापर करून त्यांनी आपल्या बागेत कडीपत्ता, तमालपत्र, मिरी यांसारख्या मसाल्याच्या झाडांपासून ते आंबा, नारळ, फणस, काजू आणि विविध दुर्मिळ फुलझाडे फुलवली (Pimpri News) आहेत.

जगदीश नाईक यांची बागकामाची आवड, पर्यावरणाची काळजी घेण्याची तळमळ आणि त्यासाठी सतत काहीतरी नवीन करण्याची त्यांची वृत्ती आजच्या पिढीसाठी निश्चितच एक आदर्श आहे. त्यांच्या या कार्यामुळे ‘कचरा हा खरंच ‘कचरा’ नसतो, त्याला योग्य प्रकारे (Pimpri News) वापरले तर ते ‘सोनं’ बनू शकते’, हे सिद्ध होते.