Team MyPuneCity – निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं काम सध्या वेगात सुरू आहे. मात्र या कामात सुरक्षेच्या मूलभूत उपाययोजनांचा अभाव दिसून येतो. आज दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी मधुकर पवळे उड्डाणपूलाजवळ, लोकमान्य टिळक रोडवरील श्री विशाल ज्वेलर्स समोर गंभीर अपघात घडला. आकुर्डी दत्तवाडी येथील एका शाळेची विद्यार्थिनी नंदिता तरळ हिच्या अंगावर मेट्रो रेल्वे कंपाऊंडसाठी उभे केलेले लोखंडी पत्रे अचानक कोसळले. या घटनेत नंदिता जखमी झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर ठिकाणी सध्या मेट्रोच्या कामासाठी पत्रे लावून कंपाऊंड करण्यात आले आहे. मात्र, पत्र्यांची सुरक्षा व्यवस्था निकृष्ट व अस्थिर असल्याने सदर प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी तातडीने प्रतिक्रिया देत मेट्रो प्रशासनाला जाब विचारला आहे. “या गंभीर अपघाताची मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घ्यावी व संबंधित जबाबदारांवर कडक कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
Pune : कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलची नुसतीच ‘ढोल-बडवणी’, वास्तवात मात्र निराशा – रघुनाथ कुचिक
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील कामकाज स्थगित ठेवण्याची मागणी याआधी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आजचा अपघात घडला, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

“निगडी ते पिंपरी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो कामात नागरिकांच्या सुरक्षेचा पूर्णतः अभाव आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील काम तात्काळ थांबवले जावे, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात,” असा इशारा भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी दिला.