Team MyPuneCity – “पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने आतापर्यंत ४८ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली, तरीही त्यापैकी एकालाही त्यांच्या मायदेशी परत पाठवलेले नाही. मग हे घुसखोर अजूनही भारतातच कसे?” असा थेट सवाल महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सरचिटणीस प्रदीप नाईक यांनी केला आहे.
नाईक यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार (RTI) पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे माहिती मागवली होती. या माहितीनुसार, पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंत ४८ बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर देशात घुसखोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यापैकी एकालाही आजपर्यंत बांगलादेशात परत पाठविण्यात आलेले नाही, असे धक्कादायक उत्तर पोलिसांकडून मिळाले.
या उत्तराच्या पार्श्वभूमीवर प्रदीप नाईक म्हणाले, “बांगलादेशी घुसखोर हे केवळ बेकायदेशीरच नाहीत, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही मोठा धोका आहेत. तरीही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाची गंभीर दुर्लक्ष दिसून येते. या घुसखोरांवर तातडीने फास्टट्रॅक न्यायालयात खटले चालवून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवले पाहिजे.”
यासंदर्भात पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, “पकडण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांवर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय त्यांना परत पाठवणे शक्य नसते. न्यायालयाच्या आदेशानुसारच पुढील कारवाई केली जाते.”
मात्र, अशा प्रकरणांमध्ये विलंब न होता तातडीने कारवाई व्हावी यासाठी केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही नाईक यांनी केली आहे. “या घुसखोरांचे प्रकरण ‘राष्ट्रीय सुरक्षा’ म्हणून हाताळावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.