पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभाग आयोजित ‘घरो घरी तिरंगा’ अभियानात हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
Team My Pune City – हातामध्ये तिरंगा घेऊन चालणारे विद्यार्थी, देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेले (PCMC)वातावरण आणि ढोल-ताशांच्या तालावर धडकणारी ऐक्याची नाडी… अशा उत्साहाच्या वातावरणात आज पिंपरी चिंचवड शहरात शाळकरी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी निघाली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ‘घरो घरी तिरंगा’ अभियानाचा सोहळा केवळ प्रभात फेरीतूनच नव्हे, तर नागरिकांच्या हृदयातून अवतरला. यानिमित्ताने देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हजारो विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे उगवत्या सूर्याला साक्षी ठेवत ऐक्याची प्रभात उजळवली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने ‘घरो घर तिरंगा’ अभियानांतर्गत महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या सर्व शाळांमध्ये उत्साह, देशभक्ती आणि ऐक्याचा संदेश देणाऱ्या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तिरंगी झेंडे, देशभक्तीपर घोषवाक्ये आणि ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. महापालिका हद्दीतील प्रत्येक शाळेच्या एक किलोमीटर परिसरात प्रभात फेरी काढण्याचे नियोजन करण्यात आले होते.
Talegaon Dabhade: नूतन अभियांत्रिकीमध्ये उद्योजकता विकास सत्राचे आयोजन
PMPML: रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसाच्या कालावधीत पीएमपीएमएल ने कमावले तब्बल 10 कोटी
प्रत्येक शाळेने आपल्या परिसरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करत देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’ या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा, देशभक्तीचे फलक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी पोस्टर्स घेऊन प्रभात फेरीत सहभाग घेतला.
या फेरीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ देशभक्तीचे प्रदर्शन नव्हे, तर सामाजिक बांधिलकी व पर्यावरणाबद्दल जनजागृती करणेही होते. विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिकमुक्त भारत’, ‘स्वच्छ भारत अभियान’, ‘जलसंवर्धन’, ‘वृक्षारोपण’ यांसारख्या विषयांवर आधारित संदेशफलक फेरीत दाखवले. यामुळे प्रभात फेरी केवळ राष्ट्रीय सणाचा भाग न राहता समाजहिताच्या मूल्यांचा प्रचार करणारा उपक्रम ठरला.