Team My Pune City – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा 2025 हा मोठा “महाघोटाळा” असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी केला आहे. या घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी करून हा आराखडा तत्काळ रद्द करावा, अशी त्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे ( PCMC Development Plan 2025) लेखी मागणी आहे.
भापकर यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी 14 मार्च 2025 रोजी हा प्रारूप विकास आराखडा जाहीर केला होता आणि नागरिकांना सूचना व हरकती नोंदवण्यासाठी 14 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. आतापर्यंत सुमारे 30 हजार लेखी हरकती प्राप्त झाल्या असून, अजूनही मोठ्या प्रमाणात नागरिक आपली मते नोंदवत आहेत.
घोटाळ्याचे गंभीर आरोप
मार्च 2024 पासून मे 2025 पर्यंत आराखडा दाबून ठेवला: या कालावधीत नगररचना विभाग, आयुक्त, राजकीय नेते आणि बांधकाम व्यावसायिकांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ( PCMC Development Plan 2025)
आरक्षणांची संख्या 1155 वरून 1350 वर: 1995 च्या आराखड्यातील 1155 आरक्षणांपैकी अनेक पूर्ण न झालेल्या आरक्षणांची फेरतपासणी होण्याची अपेक्षा असतानाही उलटपक्षी 1350 नवीन आरक्षणे टाकण्यात आली.
राजकीय सूडबुद्धीने आरक्षणे: काही क्षेत्रांत आरक्षणे मुद्दामहून वाढवली गेली असून, काही भागांत राजकीय नेत्यांच्या जागा वगळण्यात आल्या.
नदीपुररेषांमध्ये छेडछाड: पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या लाल व निळ्या पुररेषेवर पाटबंधारे खात्याच्या अधिकृत माहितीऐवजी महापालिकेच्या मर्जीनुसार फेरबदल करण्यात आलेत.
हजारो घरांवर बुलडोझरचा धोका: वाकड, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, सांगवी आदी ठिकाणी आरक्षणामुळे अनेक घरे पाडण्याची वेळ येऊ शकते.
पवना नगर, रामनगर परिसरातील मंदिरे व घरे धोक्यात: संतोषी माता व श्रीराम मंदिरावर अनावश्यक रस्ते दाखवून ते आरक्षणात घेतल्याचा आरोप करण्यात आला ( PCMC Development Plan 2025) आहे.
महापुरुषांच्या स्मारकांवर आरक्षण: बाबासाहेब आंबेडकर, रमाई, लहुजी साळवे, वासुदेव फडके यांच्या स्मारक जागांवर पोलीस स्टेशन व इतर आरक्षणे टाकल्याने संताप व्यक्त केला आहे.
भापकर यांनी या आराखड्याला शहरविकासाऐवजी “शहरविनाश आराखडा” असे संबोधले असून, अशा प्रकारे बनवण्यात आलेला आराखडा सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे, असा इशारा दिला आहे. त्यांनी राजकीय हस्तक्षेप व भ्रष्टाचार विरहित विकास आराखडा तयार होण्यासाठी इमानदार आणि तज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली ( PCMC Development Plan 2025) आहे.