Team MyPuneCity – जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये रविवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी (Pahalgam Terrorist Attack) पर्यटकांच्या गटावर अंधाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात किमान २७ पर्यटक ठार झाले असल्याची भीती व्यक्त होत असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्रातीलही दोन पर्यटक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. पुण्यातील पाचजणांच्या कुटुंबावर गोळीबार झाला. त्यात दोघे जखमी झाल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी (Pahalgam Terrorist Attack) पर्यटकांच्या गटावर अंदाधुंद गोळीबार केला. ४० राऊंड फायर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात एक नवविवाहित जोडपेही अडकलं. पत्नीच्या सांगण्यानुसार, तिच्या पतीचा धर्म विचारल्यानंतर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पतीच्या मृतदेहाजवळ बसलेल्या त्या स्त्रीच्या असहाय अवस्थेने घटनास्थळी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये (Pahalgam Terror Attack) महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दिलीप डिसले आणि अतुल मोने असं या मृत पर्यटकांची नावे आहेत. तर दोन पर्यटक जखमी असून एकजण पनवेलचे असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांना फोन करुन या हल्ल्याची माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दिलीप डिसले आणिअतुल मोने या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे जमखी आहेत. जखमींमध्ये माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. तर एस भालचंद्र राव हे राज्यातील कोणत्या भागातील आहेत याची माहिती घेतली जात आहे.
जी काही मदत लागेल ती मदत प्रशासन करत आहे. अशा प्रकारच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत असून त्यांचा नायनाट केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
धर्म विचारून गोळ्या झाडल्या
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) केलेल्या पर्यटकांवरील हल्ल्यामध्ये २७ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते. तसेच अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसेच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे.
पुण्यातील पर्यटकांवर गोळीबार
पुण्यातील पाच जणांचं कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेलं होतं. ज्यामधे दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मीरी पोषाख घालून फोटो काढत होते. त्यावेळी त्यांच्यासमोर अचानक दहशतवादी आले.
या पर्यटकांना दहशतवाद्यांनी नावे विचारली. नावांवरुन त्यांचा धर्म लक्षात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी आहे.
हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) देशभरात खळबळ उडाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात तातडीने संवाद झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी तातडीने श्रीनगरकडे प्रयाण केलं आहे. त्यांनी ट्विटद्वारे हल्ल्याविषयी तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. तसेच, या कृत्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना (Pahalgam Terrorist Attack) कोणतीही सूट न देता कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.
श्रीनगरमध्ये पोहोचताच अमित शहा सर्व सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्राथमिक सुरक्षा आढावा घेण्यात आला असून, प्रत्यक्ष भेटीद्वारे पुढील कारवाईचे नियोजन केले जाणार आहे.
दरम्यान, जखमींमध्ये महाराष्ट्रातील माणिक पाटील आणि एस. भालचंद्र यांचा समावेश असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
पर्यटकांसाठी २४ तास मदत सेवा उपलब्ध
या घटनेनंतर (Pahalgam Terrorist Attack) काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या इतर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, अनंतनाग पोलीस कंट्रोल रूममार्फत २४ तास कार्यरत मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. पर्यटकांनी कोणतीही अडचण भासल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोबाईल : ९५९६७७७६६९
लँडलाईन : ०१९३२-२२५८७०
व्हॉट्सअॅप : ९४१९०५१९४०