तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या तत्परतेमुळे दोन्ही मुलांचा लागला शोध
Team MyPuneCity –मावळ तालुक्यातील इंदोरी येथील एक वृद्ध महिला तिच्या नातवंडांना घरी ठेऊन हॉस्पिटल मध्ये गेली. हॉस्पिटल मधून आल्यानंतर दोन्ही नातवंडे बेपत्ता असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तात्काळ तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी परिसरात शोघ घेत मुलांना आजीकडे सुखरूपपणे सुपूर्त केले.
श्रेयस वेताळ (७), स्वराज वेताळ (५) अशी दोन चिमुकल्यांची नावे आहेत. त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला असून त्यांचे संगोपन आजी कल्पना विश्वनाथ वेताळ या करतात. कल्पना वेताळ सोमवारी (९ जून) सकाळी पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटल येथे गेल्या होत्या. जाताना त्यांनी दोन्ही नातवंडे श्रेयस आणि स्वराज यांना त्यांचा दुसरा मुलगा गणेश याच्याकडे ठेवले. गणेश याला दारूचे व्यसन असल्याने आई बाहेर जाताच त्याने देखील घरातून पोबारा केला.
दोन्ही मुले चुलता गणेश याच्या मागे मागे जाऊ लागली. गणेश याने मुलांना १० रुपये दिले आणि घरी जाण्यास सांगितले. मात्र मुले घरी न जाता भरकटली. काही वेळाने गणेश घरी आला असता त्याला दोन्ही मुलगे दिसली नाहीत. दुपारी तीन वाजताच्या सुमारास कल्पना वेताळ देखील हॉस्पिटल मधून घरी आल्या. तेंव्हा त्यांना हा प्रकार समजला. कल्पना यांनी थेट तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर, पोलीस हवालदार वसीम शेख यांच्यासह तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी इंदोरी गाव, प्रगती नगर, गांधी नगर, चव्हाण आळी, अमृता नगर, पानसरे वस्ती, साई दर्पण या परिसरात कसून शोध घेतला. शोध घेत असताना इंदोरी गावाजवळील बैलगाडा शर्यत घाटाजवळ असलेल्या एका पाण्याच्या खड्ड्यात दोन मुले खेळताना दिसून आली. घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत ही मुले गेली होती. पोलिसांच्या तत्परतेमुळे दोन्ही मुले सापडली.