Team MyPuneCity –मराठा इतिहासातील पराक्रमी आणि निष्ठावान स्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मस्तानीबाई यांचा कथित अपमान करणाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे प्रदेशाध्यक्ष सचिन बोधनी यांनी तातडीने सार्वजनिक माफीची मागणी केली आहे. अन्यथा संपूर्ण हिंदुत्ववादी समाज रस्त्यावर उतरेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.
“कोथरूडची बाई” ही अपमानास्पद टिप्पणी
एका पोस्टरवरून किंवा वक्तव्यावरून मस्तानीबाईंचा उल्लेख “कोथरूडची बाई” अशा अवमानकारक शब्दात करण्यात आल्याचा आरोप करत बोधनी यांनी यास तीव्र शब्दांत विरोध केला आहे. “हा उल्लेख केवळ मस्तानीबाईंचा नाही, तर संपूर्ण स्त्रीत्वाचा अपमान आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी त्या व्यक्तीने त्वरित माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
मस्तानीबाई – शौर्य, निष्ठा आणि प्रेरणेचा इतिहास
प्रेस निवेदनात बोधनी यांनी मस्तानीबाईंच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण करून दिली आहे. बाजीराव पेशव्यांसोबत रणांगणावर लढणाऱ्या मस्तानीबाई यांचे सुपुत्र शमशेर बहादूर यांचा पराक्रम, आणि पुढील पिढीतील झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंसोबत १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात लढणारा त्यांचा वंशज – हा गौरवशाली इतिहास लक्षात घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.
“अशा शब्दांचा वापर स्वतःच्या महिलांसाठी केला असता?”
बोधनी यांनी रोखठोक प्रश्न उपस्थित केला – “या प्रकारची भाषा जर त्या वक्तव्य करणाऱ्यांनी स्वतःच्या घरातील महिलांसाठी वापरली असती, तर काय प्रतिक्रिया उमटली असती?” समाजाने अशा मानसिकतेचा निषेध करणे आवश्यक असून, महिलांचा अपमान करणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला थारा देऊ नये, असे त्यांनी सांगितले.
Pimpri Chinchwad: राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीने भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळावा
तीन ठोस मागण्या
या संदर्भात त्यांनी तीन मुख्य मागण्या मांडल्या आहेत:
- संबंधित व्यक्तींनी तात्काळ सार्वजनिक माफी मागावी.
- त्या ठिकाणी लावलेले आक्षेपार्ह फलक त्वरित हटवावेत.
- त्या जागीच स्पष्ट माफीची माहिती फलकावर लावावी.
आंदोलनाचा इशारा
जर वरील तीनही मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत, तर महाराष्ट्रातील संपूर्ण हिंदुत्ववादी समाज रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. “याचे परिणाम संबंधित व्यक्तींनाच भोगावे लागतील,” असा ठाम शब्दांत त्यांनी चेतावणी दिली.
राजकीय पक्षांनाही इशारा
या प्रकारात कोणताही राजकीय द्वेष नसल्याचे नमूद करत, “जर हाच त्या पक्षाचा अधिकृत दृष्टिकोन असेल, तर आम्ही आगामी निवडणुकीत त्या पक्षाविरोधात प्रचार करू,” असे बोधनी यांनी स्पष्ट केले.
मस्तानीबाईसारख्या ऐतिहासिक स्त्री व्यक्तिमत्त्वाबद्दल केलेल्या कोणत्याही अवमानास महाराष्ट्र ब्राह्मण सभा सहन करणार नाही, असा स्पष्ट संदेश या निवेदनातून दिला गेला असून, यापुढील राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर या इशाऱ्याचे परिणाम निश्चितच दिसू शकतात.