Team MyPuneCity – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाच्या बैलजोडी पूजनाचे औचित्य साधून आळंदीत आलेल्या राज्याच्या वने व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी देवस्थान परिसरात कत्तलखाना होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका पत्रकारांशी बोलताना मांडली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाच्या बैलजोडी पूजनाचा कार्यक्रम आळंदीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेल्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी बैलजोडीचे पूजन करून पालखी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांशी आगामी विकास आराखड्याबाबत चर्चा केली.
Pune : अभिनेते प्रसाद ओक यांना यावर्षीचा निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर
त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही मत आहे की देशातील मोठी तीर्थस्थळे जपली गेली पाहिजेत. त्यामुळे देवस्थांनांचे जिर्णोद्धार होणे आवश्यक आहे. यामुळे देशभक्ती जागृत होते आणि आपली संस्कृती पुनरुज्जीवित होते. सरकारकडून आता अनेक देवस्थांनांचे आराखडे मंजूर होत आहेत. मागील महिन्यात आंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरांसाठी आराखडा मंजूर झाला आहे. त्याच धर्तीवर आळंदीचाही विकास केला जाईल.”
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आळंदीच्या शेजारी चार एकर जागेवर कत्तलखाना आरक्षित केल्याबाबत विचारले असता त्यांनी (Madhuri Misal) स्पष्ट शब्दांत सांगितले की, “देवस्थानच्या आजूबाजूला असे काहीही होणार नाही. यासंदर्भात तक्रार आली असून मी तुम्हाला शंभर टक्के सांगते, की येथे स्लॉटर हाऊस होऊ देणार नाही.”
पत्रकारांनी नदिपलिकडील (हवेली) वेश्या व्यवसायाबाबत प्रश्न विचारला असता मिसाळ म्हणाल्या, “आळंदी हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे अशा अवैध व गैरकायदेशीर धंद्यांना अजिबात वाव देता कामा नये. हे प्रकार तत्काळ थांबवले गेले पाहिजेत. मी स्वतः हे प्रकरण राज्याचे गृहमंत्री यांच्या ध्यानात आणून देईन व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
एसटी डेपोच्या पुनर्विकासाबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका घेत, “येथील एसटी डेपोचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव आणावा, त्यावर आम्ही काम करू,” असे सांगितले.
इंद्रायणी नदी प्रदूषणाविषयी विचारले असता त्या (Madhuri Misal) म्हणाल्या, “गेल्या आठवड्यात आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत याबाबत बैठक झाली आहे. मुख्यमंत्र्यांकडेही निवेदन देण्यात आले आहे. लवकरच यावर मुख्यमंत्री आणि संबधित यंत्रणांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.”
या संपूर्ण भेटीदरम्यान त्यांनी आळंदीच्या विकासासाठी सर्वतोपरी पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.