Team MyPuneCity -पुणे जिल्ह्यातील कुंडमळा या ठिकाणी झालेल्या पूल दुर्घटना प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, यातील मृत्यूप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने राहुल डंबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे ( ई-मेल द्वारे ) करण्यात आली आहे.
कुंडमळा दुर्घटना ही अत्यंत वेदनादायी व संताप जनक असून प्रशासन अद्याप पर्यंत संभाव्य दुर्घटनाग्रस्त स्थळांची यादी करण्यात अपयशी ठरले आहे. जे पूल यापूर्वी धोकादायक ठरवले गेले आहेत त्या – त्या ठिकाणी योग्य ते व्यवस्थापन करण्यातही जिल्हा प्रशासनाला कोणताही रस नसल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच कुंडमाळा दुर्घटने मध्ये नागरिकांना आपला जीव गमावा लागलेला आहे, याची शिक्षाही या घटनेत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करूनच दिली जावी, अशी मागणी यावेळी डंबाळे यांनी केली.
Pune : मूल्यात्मक व्यापक समाजकल्याण व्यवस्था म्हणजे खरे करिअर -समर नखाते
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या सूचनांकडे देखील या निमित्ताने दुर्लक्ष झाल्याची दिसून येत आहे. राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा थेट मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली असताना अशा प्रकारची गंभीर चूक होणे अपेक्षित नाही. त्यामुळे या घटनेतून बोध घेत अशा प्रकारची कोणतीही घटना यापुढे होणार नाही यासाठी राज्य सरकारने कठोर धोरण करणे आवश्यक असल्याचेही डंबाळे यांनी यावेळी सांगितले.