Team MyPuneCity – खेड तालुक्यातील कळमोडी धरण आज मंगळवारी दिनांक 24 जून रोजी दुपारी 100 टक्के भरले असून, पुणे जिल्ह्यातील पूर्ण क्षमतेने भरलेले हे पहिले धरण ठरले आहे.
1.5 टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेल्या या धरणातून सांडव्यावरून पाण्याचा अनियंत्रित विसर्ग आरळा नदीत सुरू झाला आहे. खेड तालुक्यात कळमोडी, चासकमान आणि भामा आसखेड ही तीन धरणे आहेत.
दरवाजाविरहित असलेल्या या धरणातून पाणी सांडव्यावरून वाहते. भीमाशंकर डोंगररांगेत मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आरळा नदीला पूर आल्याने धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढला. गेल्या दोन दिवसांत पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी, धरण परिसरातील सातत्यपूर्ण पावसाने कळमोडी धरण पूर्ण भरले. चासकमान आणि भामा आसखेड धरणांचा पाणीसाठा देखील झपाट्याने वाढत आहे.
कळमोडी धरण दरवाजाविरहित असल्याने सांडव्यावरून अनियंत्रित पाण्याचा विसर्ग आरळा नदीत सुरू आहे. नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना चासकमान पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत.