Team MyPuneCity –पुण्यातील ‘दरबार बँड’ चे संस्थापक-संचालक ,ज्येष्ठ सॅक्सोफोन वादक इक्बाल दरबार यांचे शनिवारी निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा संकल्पनेला रुजवणाऱ्या कलावंतांमध्ये इक्बाल दरबार यांचा उल्लेख आदराने केला जातो. त्यांच्या वादनाचे चाहतावर्ग केवळ पुणे-मुंबईपर्यंतच मर्यादित नव्हते, तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही त्यांच्या वादनाने मंत्रमुग्ध झाले होते.
या सादरीकरणाने भारावले होते दिलीप कुमार
पुणे महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा सन्मान करण्यात आला होता, त्या वेळी ‘मधुबन में राधिका नाचे रे’ हे गीत दरबार यांनी सॅक्सोफोनवर सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाने दिलीप कुमार इतके प्रभावित झाले की, त्यांनी उभे राहून त्यांना दाद दिली आणि ‘वन्स मोअर’ची मागणी केली.
इकबाल दरबार यांचे कार्य केवळ संगीतपुरते मर्यादित नव्हते. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सेवाभाव ही त्यांच्या कार्यशैलीची खास वैशिष्ट्ये होती. दरवर्षी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीची सुरुवात त्यांच्या दरबार बँडद्वारे सादर केलेल्या आरतीनेच होत असे. हे केवळ परंपरेचे नव्हे, तर समाजाशी असलेल्या त्यांच्या नात्याचे प्रतीक होते.
त्यांनी सीमेवर जाऊन आपल्या वादनाने भारतीय जवानांची मने जिंकली आणि त्या कार्यक्रमातून मिळालेला निधी सैनिकांना कृतज्ञता म्हणून दिला होता.
त्याचप्रमाणे, भोई फाउंडेशनच्या पुण्याजागर उपक्रमासाठीही त्यांनी कृतज्ञता निधी दिला. ‘मोहम्मद रफी आर्ट फाउंडेशन’च्या माध्यमातून गरजू कलाकारांना वैद्यकीय व आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी ते सतत कार्यरत होते.