Team My Pune City – हिंजवडी येथील पांडव नगर परिसरात (Hinjewadi)एका भीषण अपघातात मिक्सर ट्रकखाली चिरडल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा ट्रक त्या वेळेत रस्त्यावर होता, जेव्हा जडवाहतूक वाहने चालविण्यावर सक्त मनाई आहे. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पांडव नगर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत जडवाहने जसे की मिक्सर ट्रक, डंपर, कंटेनर आदींना शहरात प्रवेश करण्यास बंदी आहे. मात्र या नियमांकडे दुर्लक्ष करून चालकाने मिक्सर ट्रक चालविला आणि त्यामुळे दुर्दैवी अपघात घडला.
हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी सांगितले की, “हा अपघात सुमारे ११ वाजता झाला. त्या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. घटनेची माहिती मिळताच आमचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बंदीच्या वेळेत ट्रक फिरत असतानाच महिलेवर हा अपघात झाला.”
PCU : समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता सिद्ध करा – डॉ. प्रसाद प्रधान
Indrayani Junior College : इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचा खोखो संघ तालुकास्तरावर अव्वल
दरम्यान, हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पंधारे म्हणाले, “अपघातानंतर चालकाने वाहन सोडून पळ काढला. आम्ही तो मिक्सर ट्रक जप्त केला आहे आणि चालकाचा शोध सुरु आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०४ (अ) नुसार ‘खुनाचा प्रयत्न नसलेला मनुष्यवध’ (Culpable Homicide not amounting to murder) असा गुन्हा नोंदविण्यात येत आहे. चालकाने जाणीवपूर्वक वाहतूक बंदीचा भंग केला आहे. तपास सुरु आहे.”
या अपघातामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट असून नागरिकांनी बंदीच्या वेळेत जडवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.