Team My Pune City – शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ( Gajanan Mehendale) गाढे अभ्यासक, ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे (वय ७८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने १७ सप्टेंबर रोजी पुण्यात निधन झाले. आज ( 18 सप्टेंबर ) दुपारी १ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या भाच्याने, सत्येन वेलणकर यांनी त्यांना मंत्राग्नी दिला.
अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचे पार्थिव भारत इतिहास संशोधक मंडळात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी पांडुरंग बलकवडे, बी. डी. कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, मंदार लवाटे, राहूल सोलापूरकर, माधव भांडारी, अविनाश धर्माधिकारी, विक्रमसिंह मोहिते, भूपाल पटवर्धन, लीनाताई मेहेंदळे, केदार फाळके, श्रीनिवास कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, कर्नल पराग मोडक, विंग कमांडर शशिकांत ओक यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
Fraud : फसवणुकीप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल
५० वर्षांचे अखंड संशोधनकार्य
गेल्या पाच दशकांपासून मेहेंदळे यांनी इतिहास संशोधनाला वाहून घेतले होते. शिवचरित्र, मराठ्यांचे आरमार, ‘Shivaji – His Life and Times’, ‘Shivaji झाला नसता तर’, ‘Tipu as a War’ यांसारखी त्यांची पुस्तके देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. फारसी, मोडी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन अशा अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या मेहेंदळे यांनी इतिहासातील सत्य-असत्य ( Gajanan Mehendale) उलगडणे हे आपले ध्येय मानले.१९७१ च्या भारत-पाक युद्धात ते युद्ध पत्रकार म्हणून दोन्ही सीमेवर हजर होते. ते मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते आणि सध्या ते दुसऱ्या महायुद्धावर पाच हजार पानांचे पुस्तक प्रकाशित करण्याच्या तयारीत होते.
मोहन भागवत यांची भावना
“Shivaji His Life And Times कार श्री गजाननराव मेहेंदळे यांच्या आकस्मिक निधनामुळे एक सत्यनिष्ठ व तपस्वी इतिहास संशोधक काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. भारतीय इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात परिश्रमपूर्वक प्राविण्य मिळवून युद्ध पत्रकारितेत रत असलेल्या गजाननरावांनी श्री शिवछत्रपतींच्या इतिहासाची साधने भारतभर धुंडाळली आणि अनेक भाषांचे प्राविण्य हस्तगत केले. ती तपस्या इतिहास संशोधन क्षेत्रात पदार्पण केलेल्या नवीन संशोधकांकरता आदर्शवत आहे. संशोधनाचे काम अपुरे सोडून काळाने त्यांना ओढून नेले ही इतिहास संशोधन क्षेत्राची मोठीच हानी आहे. मी माझी व्यक्तिगत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे श्रद्धांजली त्यांच्या स्मृतीला अर्पण करीत आहे.,“असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात म्हटले ( Gajanan Mehendale) आहे .