Team My Pune City –राज्य सरकारने (Devendra Fadnavis )मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू केले जाणार आहे. राज्य सरकारने तसा जीआर काढला आहे. सरकारच्या या जीआरनंतर आता मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले ,मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले (Devendra Fadnavis )याचा मला आनंद आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने आज मराठा समाजाच्या हितासाठी चांगला तोडगा काढला याचाही मला आनंद आहे. जरांगे यांचे उपोषण आता संपलेले आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासूनच तयारी होती. पण मनोज जरांगे यांची सरसकट कुणबी प्रमाणत्र द्यावे या मागणीला कायदेशीर अडचणी होत्या. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नव्हते.
Devendra Fadnavis: सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी झाला खुला
जरांगे यांच्या लक्षात ही वस्तूस्थिती आणून देण्यात आले. आपल्या कायद्याप्रमाणे, देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नव्हे तर व्यक्तीला मिळत असते. संबंधित व्यक्तीने ते आरक्षण मागायचं असायचं. म्हणूनच सरसकट आरक्षण कायद्याच्या पताळीवर टिकणार नाही, हे जरांगे यांना सांगण्यात आले. जरांगे यांनीदेखील ही भूमिका समजून घेतली आहे. कायद्यात सरसकट आरक्षण बसत नसेल तर ते करू नका असे जरांगे यांनी सांगितले आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीने चर्चा केली आणि जीआर तयार झाला, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राधाकृष्ण विखे पाटील आणि उपसमितीतील सर्व प्रमुख नेत्यांचं मी आभार मानतो. त्यांनी सातत्याने बसून, अभ्यास करून हा मार्ग काढला आहे. जे मराठवाड्यात राहणारे, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, रक्त-नात्यातील कुणाचाही कुणबी उल्लेख असेल तर त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे. हैदरबाद गॅझेटच्या माध्यमातून, ज्यांना पुरावा मिळेल त्यांना आरक्षण मिळणार.ज्याच्याकडे पुरावा नाही त्याला याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही असही मुख्यमंत्री म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मला कितीही शिव्या दिल्या, दोष दिले तरी मी सगळ्या समाजासाठी काम करणार. समजाला न्याय द्यायचा हेच ध्येय होतं. तो न्याय देताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही, अन्यायाची भावना निर्माण होणार नाही असा कायदेशीर निर्णय करावा लागेल. मराठा असो, ओबीसी असो वा महाराष्ट्रातील कोणताही समाज असो, प्रत्येक समाजासाठी काम करणं हे माझं कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यावेळी कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार देखील मिळतात.”