Team MyPuneCity – येत्या १८ जून रोजी श्री क्षेत्र देहूगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४०व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूगावात शुक्रवारी नियोजन आढावा बैठक पार पडली. भाविक आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध शासकीय यंत्रणा, मंदिर संस्थान आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी ही बैठक मुख्यमंदिर परिसरातील दर्शनबारी सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने होते. यावेळी पिंपरी चिंचवडचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश कसबे, प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Pune: धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला, त्यांना मनःशांती मिळेल- पंकजा मुंडे
बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः देहू–देहूरोड पालखी मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविणे, येलवाडी (देहू फाटा) मार्ग दुरुस्ती, अलगदशहावली दर्ग्याजवळील कापूर ओढा पुलावरील तुटलेले कठडे दुरुस्त करणे, तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर उपाययोजना करणे, शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे याकडे लक्ष वेधण्यात आले.
महावितरणचे संतोष झोडगे यांनी वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी तीन रोहित्रांची व्यवस्था, ५०० मीटर केबल टाकणे आणि सर्व डिपी सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले. तसेच वीज खंडित झाल्यास पाणीपुरवठ्यावर होणाऱ्या परिणामाची गंभीर दखल घेत डॉ. माने यांनी आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
डॉ. माने यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय विभागांनी एकत्रितपणे पुढील कामकाज राबवण्याच्या सूचना केल्या. यात रस्त्यावरील खड्डे बुजवणे, मुरूम टाकणे, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, आरोग्य व औषधोपचार सेवा, वाहतूक नियोजन, पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, नियंत्रण कक्ष स्थापन करणे आणि मुक्कामी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.
श्री संस्थानचे माजी विश्वस्त अभिजित मोरे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना, “देहूत वर्षभरात तीन मोठ्या यात्रा भरतात. त्यामुळे यात्रा काळातील कामे तात्पुरती न करता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,” असे स्पष्ट मत मांडले.
या नियोजन बैठकीत देहूच्या पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांत समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले.