Team My Pune City – अवघे तीन दिवसांवर मुलाचे लग्न. (Crime News)घरात लगीनघाई, पाहुण्यांची वर्दळ, खरेदीची लगबग आणि आनंदाचा माहोल. पण या आनंदात न्हाऊन निघालेल्या घरावर काळाने असा आघात केला की क्षणात सर्व काही उध्वस्त झाले. चिंचवड येथील मोहननगर परिसरात शुक्रवारी सकाळी पाण्याच्या टाकीत बुडून एका आईचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
मृत महिलेचे नाव आशा संजय गवळी (वय ५२, रा. मोहननगर, चिंचवड) असे असून, त्यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. आशा गवळी या गृहिणी असून त्यांचे पती पुण्यातील एका शाळेत कर्मचारी आहेत. दोन्ही मुलांना अभियंता बनविण्यासाठी गवळी दाम्पत्याने आयुष्यभर अथक परिश्रम घेतले. मोठा मुलगा विवाहित असून त्याला एक मुलगाही आहे, तर लहान मुलाचे लग्न ४ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे होणार होते. त्यापूर्वी ३ नोव्हेंबर रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Run for Unity : ‘रन फॉर युनिटी’मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
Pune: सामाजिक स्थित्यंतरांसाठी साहित्यकृतींचे मोलाचे योगदान
दरम्यान, घरात लग्नाचे धार्मिक विधी सुरू होते. पाहुण्यांची ये-जा, सजावटीची तयारी, स्वयंपाकाचे नियोजन या सर्वांमुळे घरात उत्साहाचे वातावरण होते. शुक्रवारी देवीचा वार असल्याने ‘सुवासिनींचे जेवण’ ठेवण्यात आले होते. त्यासाठी स्वयंपाकाची तयारी सुरू असतानाच पाण्याची टंचाई जाणवली. त्यामुळे आशा गवळी या सोसायटीच्या पार्किंगमधील जमिनीखालच्या टाकीतून पाणी काढण्यासाठी गेल्या. त्यांनी झाकण उघडून बादली टाकली; मात्र टाकी खोल असल्याने पाणी घेताना त्यांचा तोल गेला आणि त्या थेट पाण्याच्या टाकीत पडल्या.
सुमारे वीस मिनिटांनंतर त्यांच्या मुलाला आई दिसत नसल्याने शोध घेऊ लागला. टाकीचे झाकण उघडे दिसल्याने त्याने आत पाहिले असता आई पाण्यात बुडालेली दिसली. त्याने तत्काळ मदतीसाठी आरडाओरडा केला. शेजारी धावून आले आणि आशा यांना बाहेर काढले. त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचे सांगत वायसीएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, तेथे पोहोचताच डॉक्टरांनी आशा यांना मृत घोषित केले.
या घटनेने मोहननगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लग्नाच्या तयारीचा गजबजलेला माहोल एका क्षणात शोकाकुल झाला. लग्नघरातील प्रकाशझोत मावळले, हसरे चेहरे ओले झाले आणि “आशा ताई गेल्या…” हे शब्द ऐकून परिसरातील सर्वांचे डोळे पाणावले. ज्या आईने आयुष्यभर संसार उभा केला, मुलांना घडवले, त्यांच्या लग्नाचे स्वप्न रंगवले… तीच आई तीन दिवस आधीच काळाच्या पडद्याआड गेली.


















