Team MyPuneCity – काल दि.२६ रोजी दुपारी सातारा जिल्ह्यात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने प्रवेश केला.यावेळी मोठ्या उत्साहाने सातारा जिल्ह्यातील भाविकांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला.
काल रात्री लोणंद येथे पालखी सोहळ्याने मुक्काम केला. आज दि.२७ रोजी दुपारी पालखी सोहळा लोणंद वरून तरडगाव कडे मार्गस्थ झाला.
आज खंडाळा तालुक्यातून पालखी साहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलभक्तांना वेध लागले होते ते या सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचे. संपूर्ण पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची व भाविकांची पावले लगबगीने चांदोबाच्या लिंब या दिशेने पडत होती.
हा सोहळा जसा पुढे पुढे सरकत होता, तस तसे रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वाहत होता. रस्त्याकडील शेतामध्ये ठिकठिकाणी भारुडे, भजने रंगली होती. भारुडात रंगत येत असतानच सोहळा पुढे सरकत चांदोबाचा येथे आला. या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविक भक्त व वारकऱ्यांनी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या सोहळ्यात दोन अश्व धावत असतात. एकावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली स्वार होतात. तर, दुसऱ्या अश्वावर शितोळे सरकारांचे (व्यवस्थापक) चोपदार हातात झेंडा घेऊन बसलेले असतात.रिंगण सोहळ्याचे अश्व धावतात त्या ठिकाणी आकर्षक अशी रांगोळीची पायघडी काढली होती.
पुढे माऊलींचा अश्व व मागे स्वारीचा अश्व, अशी दौड पूर्ण झाली. अश्व ज्या ठिकाणाहून गेला आहे, तेथील त्याच्या पाया खालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती. अशा प्रकारे पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंग उत्साहात पार पडले.हे उभे रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

रिंगण सोहळा जागा बदल
स्थानिक वृत्तानुसार चांदोबाचा लिंब येथे दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र यावर्षी या रिंगण सोहळ्याला भाविकांच्या गर्दीने तीन वेळा जागा पुढे बदलत रिंगण सोहळा कसाबसा पार पाडावा लागला. यामुळे पोलिस प्रशासनाने केलेली सगळी तयारी वाया गेली व आयत्या वेळी भाविकांच्या गर्दीत रिंगण लावावे लागले. दरवर्षी पुरातन चांदोबाचा लिंब येथे डाव्या बाजूला हे रिंगण लावले जाते. यावर्षी नेहमीच्या जागेवर हे रिंगण लावले होते. यासाठी दोन्ही बाजूला पोलिस, स्वयंसेवक व राष्ट्रीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी संरक्षक दोर लावले होते. मात्र संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा नगारखाना
पुढे गेल्यानंतर दोन्ही अश्व रिंगण सोहळ्यासाठी तयार झाले. याच वेळी माऊलींची पालखी पुरातन चांदोबाचा लिंब येथे आली. रिंगण सोहळ्यात रथा पुढील सत्तावीस दिंड्या दोन्ही बाजूला उभ्या राहतात.
यावर्षी रिंगण सोहळ्यासाठी या दिंड्यांना दुतर्फा उभे राहता आले नाही. त्यातच पाठीमागून येणाऱ्या भाविकांचा लोंढा रिंगण सोहळ्यात सामील होत होता. यामुळे अभूतपूर्व गोंधळात तब्बल तीन वेळा जागा बदलून रिंगण नेहमीच्या ठिकाणा पासून काही अंतरावर कसेबसे रिंगण लावले.याच गर्दीत दोन्ही अश्वांनी वाट काढत सोहळा पार पाडला.