उद्योजक प्रसाद कुलकर्णी यांचा गौरव (Brahman Business Conclave)
Team MyPuneCity : ब्राह्मण बिझनेस कॉन्क्लेव्ह (Brahman Business Conclave) कमिटीच्या वतीने “व्यवसायाची वाटचाल छोट्या पावलांकडून मोठ्या यशाकडे” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. चे फाउंडर डायरेक्टर प्रसाद कुलकर्णी यांचा उद्योजकीय क्षेत्रातील यशस्वी वाटचालीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

पाच नवोदित उद्योजकांना अर्थसाहाय्य
या कार्यक्रमात पाच नवोदित उद्योजकांना अर्थसाहाय्याची प्रमाणपत्रे देण्यात आली. अनुक्रमे 10,000/-, 20,000/-, 30,000/-, 20,000/- आणि 30,000/- अशी एकूण 1,10,000/- रुपयांची मदत वितरित झाली. यामध्ये 50,000/- रुपयांचे साहाय्य परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी तर 60,000/- रुपयांचे साहाय्य पितांबरी अभिनव उत्पादने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभूदेसाई यांनी केले.
Maval: मावळात ललिता पंचमी निमित्त भव्य कुंकुमार्चन सोहळा – हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रमाणपत्र वितरण कॅप्टन आशिष दामले, डॉ. रवींद्र प्रभूदेसाई, भाजपचे प्रवक्ते कुणाल टिळक, सीए. रणजित नातू आणि राजकीय विश्लेषक व संपादक सुशील कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

समाजहितासाठी योगदानाची ग्वाही
या वेळी कॅप्टन आशिष दामले यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या उपक्रमांची माहिती देताना समाजातील समस्यांची ओळख पटविण्यासाठी आतापर्यंत 75 दौरे केले असल्याचे सांगितले. आगामी काळात समाजहितासाठी आणखी प्रभावी काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रामाणिकपणा आणि चिकाटी हे यशाचे मंत्र
डॉ. रवींद्र प्रभूदेसाई यांनी सांगितले की, “व्यवसायात प्रामाणिकपणा, सचोटी आणि कष्ट हाच यशाचा खरा मंत्र आहे. ब्राह्मण समाजाने नोकरी शोधणारा नव्हे, तर नोकरी देणारा समाज व्हायला हवे.”
सुशील कुलकर्णी यांनी मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि संकटांवर मात करण्याचे आवाहन केले. त्यांनी उदाहरण देताना म्हटले, “हनुमानाला जांबुवंताने ताकद दाखवून दिली, त्याप्रमाणे आपल्यालाही स्वतःची ताकद ओळखायला हवी. ब्राह्मण बिझनेस कॉन्क्लेव्ह कमिटी उद्योजकांसाठी नेहमीच जांबुवंतासारखी पाठराखण करेल.”
व्यवसायातील संकटांवर मात करण्याबाबत त्यांनी ग्रामीण उदाहरण दिले – “दारात प्रेत असले तरी जर शेती पेरणीसाठी तयार असेल, तर ते ओलांडूनसुद्धा पेरणी करावी लागते. व्यवसायातही असेच कठीण प्रसंग पार करून पुढे जायला हवे.”

प्रेरणादायी अनुभवांचे कथन (Brahman Business Conclave)
प्रसाद कुलकर्णी यांनी स्वतःच्या प्रवासातील अनुभव सांगत “कलियुग असले तरी चिकाटी, निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळेच यश मिळते” असा संदेश दिला.
रणजित नातू आणि कुणाल टिळक यांनीही उद्योजकतेसाठी आवश्यक मार्गदर्शन व टिप्स दिल्या.
समितीचे परिश्रम आणि आयोजन
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष सचिन टापरे, उपाध्यक्ष अभय ओरपे, खजिनदार सुभाष फाटक, तसेच विजय फाटक, तेजस फाटक, गौरव कुलकर्णी, परीक्षित कुलकर्णी, विराज जोशी आणि डॉ. सचिन बोधनी यांनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमाला अंदाजे 150 ते 200 लोकांनी उपस्थिती लावली. निवड प्रक्रियेसाठी जुरीमध्ये वैजयंती नागवेकर, गौरी पांढरकर, डॉ. शर्वरी एअरगट्टीकर, प्रीती मोकाशी, जिजा आगाशे, विदुल जोशी, प्रिया कुलकर्णी आणि आदिती जोशी यांनी काम पाहिले.
प्रायोजक संस्थांचा सहभाग (Brahman Business Conclave)
या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक पितांबरी अभिनव उत्पादने, परशुराम आर्थिक विकास महामंडळ होते. मीडिया पार्टनर म्हणून माय पुणे सिटी न्यूज यांनी सहकार्य केले.