विराट कोहलीच्या अश्रूंनी चाहत्यांचे हृदय जिंकले, आळंदीत फटाक्यांची आतषबाजी व नृत्याने (Alandi Celebrations) साजरा झाला आनंद
Team MyPuneCity – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) जेतेपद पटकावले आणि या ऐतिहासिक विजयाचा आनंद आळंदीतील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या जल्लोषात (Alandi Celebrations) साजरा केला. अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सवर ६ धावांनी विजय मिळवत आपली पहिली आयपीएल ट्रॉफी उंचावली.
या विजयाचा आनंद आळंदीत फटाक्यांची आतषबाजी करत, ढोल-ताशांच्या गजरात आणि नृत्याने साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी आरसीबीच्या झेंड्यांसह चाहत्यांनी आनंद (Alandi Celebrations) व्यक्त करत “आरसीबी! आरसीबी!”च्या जयघोषात रस्ते गजबजले होते.
“आज आमच्या १८ वर्षांच्या धैर्य, संयम आणि निष्ठेचं फळ मिळालं. विराट कोहलीसारख्या खेळाडूने अखेर ट्रॉफी उचलताना पाहणं स्वप्नवत आहे,” अशी भावना चाहत्यांनी व्यक्त केली. काही ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर सामन्याचं थेट प्रक्षेपण सुरू होतं आणि अंतिम चेंडूवर विजय निश्चित झाल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले.
सामन्यात विजय निश्चित झाल्यावर विराट कोहली भावनाविवश झाला आणि मैदानातच अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हा क्षण पाहून आळंदीतील क्रिकेटप्रेमींनाही भावना अनावर झाल्या. “विराट कोहली रडताना पाहून आमच्याही डोळ्यांत पाणी आलं. त्याच्या मेहनतीचं अखेर चीज झालं,” असं एका चाहत्याने सांगितलं.
या ऐतिहासिक क्षणामुळे आळंदीतील क्रिकेटप्रेमींना एक वेगळीच ऊर्जा मिळाली असून, “हा क्षण आयुष्यात विसरणार नाही,” असं म्हणत अनेकांनी रात्री उशिरापर्यंत आनंदोत्सव सुरू ठेवला.