Team MyPuneCity – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त बालेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभा पराभव, लाडकी बहीण योजना आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली.
यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभेतील पराभव मान्य करत, “आपल्याला बहुमत कधीच मिळाले नाही, कायम आघाडी करून पुढे जावे लागले,” असे सांगितले. त्याचबरोबर भाजपासोबत युती करण्यामागचे कारणही स्पष्ट करत, “आपण बेरजेचे राजकारण करतो,” असे मत मांडले.

स्थानिक निवडणुकांबाबत स्पष्ट दिशा
पुढील चार महिन्यांत होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी पक्ष कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी उतरावे, असे आवाहन अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. “प्रभाग रचना कशीही असली तरी ती स्वीकारण्याची मानसिकता हवी. स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच युती करू; अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक लढवू,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
Sharad Pawar : पक्षफुटीची चिंता न करता एकसंघ राहा, जनतेशी बांधिलकी जपा – शरद पवार
प्रफुल्ल पटेल यांनीही, “जेथे शक्य असेल तेथे युती, अन्यथा स्वबळावर लढायचे,” असे स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत फायदा
“लोकसभेतील पराभवामुळे आत्मचिंतन केलं आणि ‘लाडकी बहीण’ योजना आणली. या योजनेतून महिलांच्या हातात थेट पैसा देण्याचे धोरण घेतले. यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला,” असे सांगताना अजित पवारांनी योजना बंद होणार नाही, याची हमी दिली.
पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणी मोहीम
“पक्षासाठी राज्यात १ कोटी नव्या सदस्यांची नोंदणी करायची आहे. पुण्यात १० लाख तर इतर प्रमुख जिल्ह्यांत प्रत्येकी ५ लाख सदस्य नोंदवायचे आहेत,” असा संकल्प अजित पवार (Ajit Pawar) यांनी
मांडला.
Lonavala : लोणावळ्यात घरफोडी; २९ लाखांच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्याचा डल्ला
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, आदिती तटकरे, चेतन तुपे, रुपाली चाकणकर, सुनेत्रा पवार, दीपक मानकर, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, रामराजे निंबाळकर मात्र अनुपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गट आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे नव्या जोमात तयारी करत असून युतीच्या मुद्द्यावर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. महिला, तरुण आणि अल्पसंख्याकांना संधी देण्याचा निर्धारही यावेळी अधोरेखित झाला.