अव्वाच्या सव्वा कर वसुली मग मूलभूत सुविधाचं घोड आडल कुठं? नागरिकांचा सवाल
Team MyPuneCity – आकुर्डी चिखली मुख्य रस्ता असलेल्या फोर्स मोटर जवळील ड्रेनेज लाइन अनेक दिवसांपासून चोकअप झाली असून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहते आहे. परंतु, महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसते आहे. तर आकुर्डी तून चिखलीकडे जाणारा मुख्य रस्त्यावरच ड्रेनेजचे सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना येताजाता याच सांडपाण्यातून वाट काढावी लागते आहे. सदर पाणी स्ट्रॉंम वॉटर लाईनचे आहे की ड्रेनेज लाईनचे याचा तपास अजून महापालिकेला लागला नाही. याचा मनस्ताप वाहनधारकांसह विद्यार्थी आणि पदचारी नागरिकांना होतो आहे.


महापालिकेच्या मुख्य खात्याकडून खंडोबा मंदिर चौक ते थरमॅक्स चौक दरम्यान एक किलो मीटर अंतरावर ड्रेनेजची मोठी लाईन असून सुद्धा ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन वाहते आहे. वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, उघड्या चेंबरमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तर भरमसाठ कर आकारणी करणाऱ्या महापालिकेचे मूलभूत सुविधा पुरविताना घोडे अडते कुठे असा सवाल नागरिक करत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईनचे व्हॉल्व आहे, त्याच्याभोवती गटारीचे पाणी साचलेले आहे. कदाचित तेच मैला पाणी पाईपलाईन द्वारे घरापर्यंत पोहोचत असावा.
मुख्य खात्याकडून नवीन लाइन टाकेपर्यंत जैसे थे?
मलनिस्सारण विभागाकडून नवीन ड्रेनेज लाइन टाकण्या पर्यंत ड्रेनेज ची जैसे थे स्थिती राहणार आहे का? तोपर्यंत क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असणाऱ्या ड्रेनेज देखभाल व दुरुस्ती तसेच स्थापत्य विभागाने तरी तूर्तास काही सोय करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
पिंपरी-चिंचवडकरांचा महापालिकेने अंत पाहू नये. आमच्याकडून कर आकरणी मोठ्या प्रमाणावर आणि वेळेत केली जाते. मात्र मूलभूत सुविधाही वेळेत देत नाही. पावसाळा सुरु झाला तेव्हापासून शहरातील ड्रेनेज ओव्हरफ्लो झाले आहे. त्यातून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहते आहे. महापालिकेने याची विल्हेवाट लावावी.
(शिवानंद चौगुले सामाजिक कार्यकर्ते)
सदर ठिकाणी अनेक दिवसापासून मैला पाणी रस्त्यावरून वाहत आहे, त्याची उपाय योजना केलीच नाही मात्र, ड्रेनेजचा मैलापाणी रस्त्यावर चर खोदून तात्पुरती वाट करून सोडून देण्यात आला आहे. मात्र, याच मैला पाण्यातून नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने लवकर कार्यवाही न केल्यास आषाढी वारी निमित्त येणाऱ्या पाहुणे मंडळांच्या निदर्शनास आल्यास महापालिकेला नामुष्की येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढण्यात यावा.
(बनवारीलाल बोरण स्थानिक रहिवासी)