Team MyPuneCity – गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad plane crash)शहरात आज घडलेल्या अत्यंत वेदनादायक विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनर ७८७ या फ्लाईटने अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे उड्डाण घेतले होते. दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी उड्डाण घेतलेल्या या विमानात १२ क्रू मेंबर्ससह एकूण २४२ प्रवासी प्रवास करत होते. मात्र केवळ ७ मिनिटांतच विमान मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या परिसरात कोसळले. या भीषण दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, एकच प्रवासी सुदैवाने बचावला आहे.
या दुर्घटनेत मरण पावलेल्यांमध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, पोर्तुगालचे ७ तर कॅनडाचा एक नागरिक होता. अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत होते. तसेच, मुंबईच्या अपर्णा महाडिक या क्रू मेंबर देखील होत्या. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांची पत्नी असल्याची माहिती आहे.
ही दुर्घटना एवढी भयावह होती की, तिचा थरारक व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांच्या मनात भीती व हळहळ निर्माण झाली. विमान कोसळताच स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी धावले, मात्र विमानाचा जोरदार स्फोट झाल्याने कोणालाही वाचवता आले नाही. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तपास सुरू (Ahmedabad plane crash) असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनीदेखील या घटनेबद्दल संवेदना व्यक्त केल्या.
Kamshet Crime News : कामशेतमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात तरुणावर हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
एअर इंडिया ही विमान कंपनी टाटा समूहाच्या मालकीची असल्याने, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाची जबाबदारीही टाटा समूह घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतकेच नव्हे तर, अपघातात विमान कोसळलेले बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाचे नुकसान भरून काढण्यासाठी टाटा समूहाने आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. या भीषण दुर्घटनेने देशभरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत आणि मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत (Ahmedabad plane crash) आहेत.