Team MyPuneCity – अपरा एकादशीच्या निमित्ताने आज आळंदी नगरीत (Alandi Ekadashi) भक्तिभावाने भारलेले वातावरण पाहायला मिळाले. पहाटेपासूनच पावसाच्या हलक्याशा सरी सुरू असतानाही भाविकांचा उत्साह कमी झालेला नव्हता.
सकाळपासूनच आभाळ दाटून आले असताना, पवित्र इंद्रायणी घाटावर स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. स्नानानंतर भाविकांनी इंद्रायणी मातेची आरती व पूजा करत भावपूर्ण वातावरण निर्माण केले.
Bus Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर औंढे पुलाजवळ शिवशाही बसचा अपघात
सिद्धबेट परिसरात निसर्गरम्य वातावरणात वृक्षांच्या छायेत काही भाविक ध्यान करत होते, तर काहीजण टाळ-मृदुंगाच्या साथीने माऊलींच्या अभंगात हरवले होते. अशा भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात, वारकरी भाविकांची दिंडी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात (Alandi Ekadashi) ग्रामप्रदक्षिणेला निघाली. खांद्यावर पताका, हातात टाळ-मृदुंग, मुखी हरिनाम – असा भक्तीमय सोहळा हलक्या पावसाच्या सरीतही अविरत सुरू होता.

आज सकाळपासूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. एकादशीच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. उपवासाच्या दिवशी भाविकांसाठी विशेष प्रसादाचे वाटप करण्यात आले. इंद्रायणी घाट, चाकण रस्ता आणि मंदिर परिसरात भाविक फोटो काढताना दिसून येत होते.
हगवणे तुला पश्चाताप होतोय का?, पत्रकारांच्या प्रश्नावर राजेंद्रचा माजोरडेपणा कायम; नेमकं काय घडलं?
एकादशीच्या निमित्ताने (Alandi Ekadashi) आळंदीतील विविध ठिकाणी हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण आळंदी नगरीत भक्तीचा, हरिनामाचा आणि पावसाच्या थेंबांचा मिलाफ दिसून आला. या भक्तिपर्वात सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांनी पावसाकडे दुर्लक्ष करत भक्तीची उंची गाठली.