मावळ मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर (Rupesh Mhalaskar) यांचे आरोप
Team MyPuneCity – वडगाव नगरपंचायत क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत विकासकामे केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. पण, त्या फसव्या वल्गना असून नागरिकांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सत्ताधाऱ्यांनी वडगाव शहरातील बिल्डर लॉबीला मुबलक पाणी दिले असून सर्वसामान्य नागरिकांचे मात्र पाण्यासाठी हाल केले. निवडणुकीच्या तोंडावर सोसायट्यांना पाण्याचे टँकर दिले. मात्र सत्तेत असताना पाच वर्षात पाणी पुरवठ्याचे काम करता आले नाही, असा आरोप मावळ मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर (Rupesh Mhalaskar) यांनी केला.
रुपेश म्हाळसकर (Rupesh Mhalaskar) यांनी वडगाव शहराच्या माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली मागील ५२ दिवसांची जनसंवाद यात्रा करून शहरातील सात हजार ५०० कुटुंबांना भेट दिल्या. त्यांनी २५ हजार नागरिकांशी संवाद साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जनसंवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नागरिकांच्या तक्रारी मांडल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमारे, तानाजी तोडकर, संतोष म्हाळसकर, सुहास इंदलकर, मच्छिंद्र मोहिते आदी उपस्थित होते.
वडगाव मधील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी आंदोलन करणार असल्याचे म्हाळसकर यांनी सांगितले.
रुपेश म्हाळसकर (Rupesh Mhalaskar) म्हणाले की, “नागरिकांनी सर्वांत जास्त तक्रारी अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत केल्या. अशुद्ध व अपुरा पाणीपुरवठा असूनही सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे राजकारण करत बिल्डर लॉबीला मोठ्या प्रमाणावर पाणी मात्र सर्वसामान्यांना कमी पाणी शहरातील एकमेव जलशुद्धीकरण प्रकल्प मोडकळीस आला आहे. पाच वर्षांत नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी मिळाले नाही. गृह प्रकल्पांचे सांडपाणी नदीमध्ये जात आहे. कचरा डेपोसाठी रस्ता नसलेली जागा खरेदी करण्यात आली. तिचाही वापर होत नाही. त्याची चौकशी होण्याची गरज असल्याचेही म्हाळसकर यांनी सांगितले.पाच वर्षांत एकही घरकुल योजना राबवली नाही. गुन्हेगारी वाढली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना अपुऱ्या आहेत. युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात आहे. आठवडे बाजार तळ्याकाठी अपुऱ्या जागेत भरतो. शहराला प्रशस्त भाजी मंडईची गरज आहे. तालुक्याचे गाव असूनही सार्वजनिक आरोग्य सुविधा नाही. येथे नगरपंचायतीचे सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटल होण्याची गरज असल्याचेही त्यांनी (Rupesh Mhalaskar) सांगितले.
शहरात घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था नाही, भाजी मंडई, बाग, बगीचा उद्याने असावी, शैक्षणिक व्यवस्था नसूनही शैक्षणिक कर कशासाठी आकारता असा सवालही म्हाळसकर यांनी या ठिकाणी उपस्थित करत स्वतःच स्वतःची पाठ थोपटून विकास कामांचे श्रेय लाटू नये असा टोला म्हाळसकरांनी लगावला.
कर आकारणीच्या ७७१ तक्रारी असून मालमत्तेच्या नोंदी वेळोवेळी घ्याव्यात आणि त्या नोंदीमध्ये पारदर्शकता हवी व कारभार चोख ठेवायला हवा. तसे या पाच वर्षात दिसलेले नाही. या पाच वर्षात विकास झाला नाही अशा जनसामान्यांच्या खूप तक्रारी आहेत. शहरातील समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायतीकडे पाठपुरावा करण्यात येईल आणि गरज पडल्यास आंदोलन करणार, असेही म्हाळसकर (Rupesh Mhalaskar) यांनी सांगितले.
कर आकारणी चुकीची – वाघमारे
वडगाव नगर पंचायतीने केलेल्या चुकीच्या कर आकारणीची यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमारे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “शहरातील मालमत्तांच्या सर्व्हेसाठी नगरपंचायतीने नेमलेल्या एजन्सीने चुकीचा सर्व्हे केला, तसेच मालमत्तांचे चुकीचे मोजमाप केले. त्यामुळे भरमसाठ कर आकारणी झाली. त्यावर ७७१ नागरिकांनी हरकती दाखल केल्या. त्यांची सुनावणी झाली, परंतु निर्णय दिला नाही.”





















