Team My Pune City – पुणे जिल्ह्यातील पावसाळी (Pune)वातावरणामुळे धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला असून कळमोडी, चासकमान, वडिवळे, भाटघर आणि नाझरे ही पाच धरणे शंभर टक्के भरली आहेत. दरम्यान, भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पाणलोटातील येवा वाढल्याने सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण देखील शंभर टक्के भरले असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.
खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली असून साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये 26.61अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. या चारही धरणांमध्ये मिळून 91.97 टक्के साठा असून, पुणेकरांच्या पाणीपुरवठ्याची वर्षभराची चिंता मिटली आहे.
Pune: ‘सेवासदन’तर्फे सेवाभावी गणेश मंडळांचा गौरव
Lohagad Fort: किल्ले लोहगड व विसापूर वरील शिवमंदिरात श्रावणी सोमवारच्या अभिषेकाची अखंडित परंपरा
दरम्यान, नीरा व भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. चासकमान धरणातून सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता १,५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. भाटघर धरणातून विद्युत केंद्राद्वारे १,६३१ क्युसेक व अस्वयंचलित द्वारांद्वारे ७,००० क्युसेक असा मिळून ८,६३१ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर नीरा-देवधर धरणातून ९,५२० क्युसेक वेगाने पाणी सोडले गेले असून, वीर धरणातून तब्बल २२,६३५ क्युसेक विसर्ग सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पानशेत धरणातूनही मुठा नदीपात्रात १,८४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. गेल्या दीड महिन्यात खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात नियमित पाऊस होत असून, सोमवारी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे १६, पानशेत येथे ५९, वरसगाव येथे ५४ आणि टेमघर येथे ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सध्या डिंभे, विसापूर, भामा-आसखेड, पवना, कासारसाई, टेमघर, वरसगाव, पानशेत, नीरा-देवधर, वीर ही धरणे शंभर टक्के क्षमतेकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत विसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.